कल्याण शहराच्या पूर्व भागातील आणि कल्याण रेल्वे स्थानकातून नियमितरित्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या लोकग्राम पुलाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या पुलाच्या उभारणीसाठी श्रीकांत शिंदे यांच्याकडून राज्य तसेच केंद्र शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला जात होता. या पाठपुराव्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने या पुलाच्या संपूर्ण उभारणीसाठी एकूण ७८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता . यातील ४२ कोटी रुपयांच्या निधीतून या पुलाच्या स्थापत्य कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मार्च २०२४ पर्यंत या पुलाचे काम पूर्ण होणार असून पूल नागरिकांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे खासदार शिंदे यांनी यावेळी सांगितले. ८०० कोटींच्या कल्याण रेल्वे स्थानक रिमॉडेलिंग प्रकल्पाचे दोन टप्प्यात विभाजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मालवाहतूक यार्ड रीमॉडेलिंगच्या कामाचा समावेश असून दुसऱ्या टप्प्यात प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. सद्यस्थितीत कल्याण पूर्वेतील नागरिकांना काही अंतर पायी चालत येऊन रेल्वे स्थानक गाठावे लागत आहे. मात्र या प्रकल्पादरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांमुळे नागरिकांना थेट आपल्या वाहनांसह स्थानक परिसरात येता येणार आहे. याच बरोबर कोणत्याही लांब पल्ल्यांच्या गाड्यांमुळे लोकल गाडयांना थांबावे लागणार नाही. तसेच लोकल गाड्यांमुळे लांब पल्ल्याच्या गाडयांचाही खोळंबा होणार नाही. यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार झाला असून लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार असल्याची माहिती खासदार शिंदे यांनी दिली.