मीरा-भाईंदरमधील उत्तन चौक येथील एका विभागाला “बांगलादेश” म्हणून झालेली दप्तरी नोंद काढून घ्यावी आणि स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार असलेले योग्य नाव नोंदवून घ्या अशी मागणी खासदार राजीन विचारे यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे. भाईंदर उत्तन येथील इंदिरानगर भागाला बांगलादेश बस थांबा असा उल्लेख महापालिकेने केला असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर दप्तरी नोंद ही तीच असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नगरसेवक जॉर्जी गोविंद आणि शर्मिला बगाजी यांनीही ही दप्तरी झालेली नोंद काढून घ्यावी अशी मागणी केली आहे. ठाणे जिल्हा परिषदेने इंदिरा आवास योजनेअंतर्गत अल्पभूधारकांना त्या ठिकाणी १५ घरे बांधली होती. यावेळीचे तत्कालीन गृह निर्माण राज्यमंत्री विलास सावंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. १९९३ साली लातूर येथे भूकंप झाला त्यावेळी १५ ते ३० कुटुंब त्या ठिकाणी स्थलांतरित झाली. त्यानंतर गुलबर्गा येथूनही काही नागरिक त्या ठिकाणी स्थायिक झाले. त्यामुळे शासकीय निमशासकीय कार्यालयात बांगलादेश म्हणून झालेली नोंद रद्द करून स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार योग्य नाव नोंदवून घ्यावे अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे.