पंचतत्वांचे संवर्धन, संरक्षण आणि जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठीच्या स्पर्धेत “अमृत” गटामध्ये विभागस्तरावर कोकण विभागात अत्युत्कृष्ट कामगिरीकरिता महापालिकेचा सन्मान करण्यात आला. माझी वसुंधरा अभियान 2022 अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी हा पुरस्कार स्विकारला. शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाद्वारे आयोजित माझी वसुंधरा अभियानात ठाणे महापालिका सहभागी होती. गेल्यावर्षी स्पर्धेच्या प्रथम वर्षात अमृत शहराच्या गटामध्ये ठाणे महापालिकेस प्रथम पारितोषीक प्राप्त झाले होते. हे अभियान राज्य शासनाद्वारे प्रतीवर्षी राबविण्यात येत असून ठाणे महानगरपालिका सदर अभियानात सातत्याने सहभागी होत असून यावर्षी “अमृत” गटामध्ये विभागस्तरावर कोकण विभागात अत्युत्कृष्ट कामगिरीकरिता ठाणे महानगरपालिकेस सन्मानित करण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पाणी पुरवठा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, शहर विकास विभाग, शिक्षण विभाग, प्रदूषण नियंत्रण विभाग, इतर सर्व विभागातील अधिकारी-कर्मचा-यांनी मेहनत घेतली होती.