जागतिक पर्यावरणाच्या दिनानिमित्त सरस्वती मंदिर ट्रस्टच्या संकुलात ‘मियावाकी’ या जॅपनिश कृषि संकल्पनेच्या आधारावर वृक्ष रोपण कार्यक्रम झाला. येउरच्या जंगलात आढळणाऱ्या ,पळस, साग, अर्जुन, तामण, बकुळ, करंज, कांचन,मोह, हिरडा, रिठा, आवळा, पांगारा, सीता अशोक, शिसम, बहावा, जांभूळ, खैर, फणस, कडूनिंब,मुचकांड, अशा बावीस प्रजातींची 90 रोपे रुजवण्यात आली. सरस्वती सेकंडरी स्कूल च्या माजी विद्यार्थी समितीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. शाळेची माजी विद्यार्थिनी आणि निसर्ग तज्ञ सीमा हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प संपन्न होत आहे. पर्यावरण क्षेत्रातील लढाऊ कार्यकर्ते रोहित जोशी हे प्रकल्प समन्वयकाची भूमिका सांभाळणार आहेत. मियावाकी ही वृक्ष लागवडीची पद्धत जागतिक किर्तिचे वनस्पति शास्त्रज्ञ मियावाकी यांनी शोधून काढली आहे आणि तिचा शहरी जंगल असा उल्लेख केला जातो. या पद्धतीत जमिनीच्या एक मीटर उंचीच्या थरात पाणी धरून ठेवणारे घटक, माती, खत,आणि जमिनीच्या वर आच्छादन असे थर केले जातात एक चौरस मीटर जागेत, दोन वृक्षांमध्ये जास्त जागा न ठेवता, तीन वेग वेगळ्या जातीची झाडे जवळ जवळ लावली जातात, ही रोपे नैसर्गिक जंगला प्रमाणे एकमेकांशी स्पर्धा करत दाटीवाटीने नैसर्गिक अधीवासात वाढतात. अशा प्रकारचा शहरी जंगलाचा प्रयोग, केवळ राज्यात नव्हेतर देशात प्रथमच महानगरातील शाळेच्या आवारात झाला असावा. पुढील काही वर्षात, हा जंगल पट्टा वाढेल, त्यामुळे परिसरातील प्रदूषण नक्की च सकारात्मक फरक पडेल.त्याच बरोबर शहरातील शालेय विद्यार्थ्यांना, कीटक,पक्षी, वनस्पती यांचा जवळून अभ्यास करता येईल असा विश्वास सुरेंद्र दिघे यांनी व्यक्त केला.