गेले दीड वर्ष प्रशासकीय राजवट असून या काळात नागरी समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. माजिवडे – मानपाडा प्रभाग समिती याबाबत अपयशी ठरल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला.
माजिवडे-मानपाडा प्रभाग समितीमध्ये संजय केळकर यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत शौचालयापासून स्मशानभूमी आणि अतिक्रमणापासून सेवा रस्त्यापर्यंत सर्व नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याची बाब केळकर यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. एकीकडे रंगरंगोटीसाठी १०० कोटींहून जास्त निधी खर्च होत असताना दुसरीकडे मात्र नागरी समस्या सोडवण्यात प्रभाग समितीला अपयश आले आहे. एक डझनहून जास्त शौचालयांची दुरवस्था झाली आहे. तीच अवस्था स्मशानभूमीची आहे. समितीच्या हद्दीत बॅनरबाजीला ऊत आला असून कारवाईबाबतही दुटप्पी भूमिका प्रशासन घेत आहे. सेवा रस्त्यांवर अतिक्रमणेही वाढली आहेत. अनधिकृत बांधकामांचा प्रश्नही गंभीर आहे. मागील दीड वर्षे आणि त्या आधीपासून विविध सुविधांबाबत पाठपुरावा होऊनही त्या सोडवण्यात प्रभाग समितीला अपयश आल्याचा आरोप करत या समस्या प्राधान्याने न सोडवल्यास भाजप रस्त्यावर उतरेल असा इशाराही केळकर यांनी अधिकाऱ्यांना दिला. ढोकाळी येथील नंदीबाबा मंदिराजवळील उद्यान अनेक दिवसांपासून बंद असल्याने स्थानिकांना त्याचा लाभ घेता येत नव्हता. संजय केळकर यांनी सूचना केल्यानंतर हे उद्यान तातडीने खुले करण्यात येईल असे उद्यान विभागाकडून सांगण्यात आले.