रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने काल पोलीस आयुक्त कार्यालयावर जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला होता. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जितेंद्र आव्हाड, अनिल परब, सुषमा अंधारे असे अनेक नेते उपस्थित होते. गद्दारांचे सरकार काही तासांचे आहे या सरकारला जे कुणी अधिकारी मदत करत आहेत त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. आमची सत्ता आल्यानंतर त्यांच्यासाठी जेल भरो कार्यक्रम राबवू असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी मोर्चानंतर झालेल्या सभेत बोलताना केला. या मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार आणि ठाणे पोलीसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यांच्या हातात निषेधाचे फलकही दिसत होते. हा मोर्चा शिवाजी मैदानापासून पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत काढण्यात आला. रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी पोलीसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही आणि उध्दव ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु भेट होऊ शकली नाही. याविरोधात शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतर्फे हा जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामुळे पोलीसांनी मुख्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले होते. त्यामुळं काही ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. मोर्चासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास झाला. तसंच सॅटीस पूलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे शाळेच्या बसही वाहतूक कोंडीत अडकल्याने विद्यार्थ्यांनाही या मोर्चाचा त्रास सहन करावा लागला.