ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गांधीगीरी करीत ठाणेकरांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला. ठाणे – पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सैनिकांनी स्वतः गटार आणि नालेसफाई हातात घेतली. आणि घोडबंदर परिसरातील तुंबलेल्या गटारांची,नाल्यांची सफाई केली. दोनच दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शहरातील नाले तीन दिवसात साफ न झाल्यास कचरा महापालिकेत टाकण्याचा इशारा दिला होता. परंतु, त्याआधीच मनसेने घेतलेल्या या पवित्र्यामुळे घोडबंदर येथील नागरिक मात्र चांगलेच सुखावले आहेत. स्थानिकांनी वेळोवेळी महापालिकेला आणि लोकप्रतिनिधींना गटारे आणि नालेसफाई करा अशी मागणी केली होती, याकडे कानाडोळा केल्याने स्वतः शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी आपल्या मन सैनिकांसह या परिसरातील तुंबलेल्या गटारांची सफाई केली. महापालिका आयुक्तांनी ९० टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला असला तरी, शहरातील अनेक नाले अद्यापही तुंबलेलेच आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेने आक्रमक होत गुरूवारी नाल्यात उतरून आंदोलन छेडले होते.तसेच, तीन दिवसात नालेसफाई न झाल्यास कचरा पालिका मुख्यालयात आणुन टाकण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे हा अल्टीमेटम संपण्यापुर्वीच आज मनसेने घोडबंदर रोड परिसरातील तुंबलेल्या नाले आणि गटारांची स्वतः सफाई केली. यावेळी घोडबंदर येथील डोंगरीपाडा.पातलीपाडा नाला, फुफाणे चाळ,ओम साई रहिवाशी संघ, किंगकाँग नगर येथील गटारे आणि नाल्यातील गाळ आणि कचरा उपसुन सफाई केली. मनसेच्या या गांधीगिरीची शहरभर चर्चा रंगली आहे.