ठाणे महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि आयुक्तांमधील वाद चांगलाच पेटला असून महापौर मिनाक्षी शिंदे यांनी एका पत्राद्वारे महापालिका आयुक्तांविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ही सार्वभौम संस्था असून महापालिका आयुक्त लोकप्रतिनिधींच्या घटनादत्त अधिकारांची पायमल्ली करून त्यांना चोर ठरवण्याचा संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. शहराच्या विकासासंदर्भात लोकप्रतिनिधींनी प्रश्न विचारल्यास त्याला उत्तर देण्याऐवजी उलटसुलट प्रश्न उपस्थित करून त्यांची वैयक्तीकरित्या चौकशी लावून त्यांना त्रास देत असल्याचं महापौरांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. पालिका आयुक्तांनी अविश्वास ठराव आणण्यासंदर्भात जे गोपनीय पत्र पाठवले आहे ते राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लिहून दिल्याचा खळबळजनक आरोप महापौरांनी केला आहे. आयुक्तांची एकूणच भूमिका ठाणेकरांवर अन्याय करणारी असून आयुक्तांना सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्याचे आदेश द्यावेत असे महापौरांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.