ठाण्याच्या खाडीमध्ये पुन्हा एकदा निवटे दिसू लागले आहेत. कधी काळी ठाण्याच्या खाडीमधून कोळी बांधवांना रोजगार मिळत होता. मात्र खाडीतील प्रदूषण वाढल्यामुळे खाडीचं भवितव्य धोक्यात आलं होतं. पण आता जवळपास २०-२२ वर्षापासून लुप्त झालेले निवटे खाडीच्या किनारी आणि गाळामध्ये दिसू लागले आहेत. शहराला २७ किलोमीटरचा खाडी किनारा लाभला आहे. या खाडीमध्ये ९० च्या दशकापर्यंत मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती मिळत होती. जवळपास ५९ प्रकारचे मासे मिळत होते. मात्र त्यानंतर प्रदूषणामुळे खाडीतील प्राणवायू नष्ट झाल्यानं खाडीतील जीव जंतूंवर परिणाम झाला. यावर वेळीच पालिकेनं उपाययोजना केल्यानं खाडीचं पाणी शुध्द होऊ लागलं आहे. त्यामुळं लुप्त झालेले निवटे पुन्हा खाडी किनारी दिसू लागले आहेत. निवट्यांचे २ प्रकार असून मोठे आणि लहान असे दोन निवटे आढळतात. ठाण्याच्या खाडी किनारी छोटे निवटे आढळतात. निवटे दिसू लागल्यामुळं ठाण्याची खाडी शुध्द होऊ लागली असून लोकांमध्ये याबाबत जागृती दिसत असल्याचं जैविक अभ्यासक डॉ. प्रमोद साळसकर यांनी सांगितलं.