मेट्रो रेलच्या कामामुळे महापालिका क्षेत्रातील महामार्ग आणि सेवा रस्त्यावरील खड्डे तातडीनं बुजवण्याची मागणी काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. मेट्रोच्या कामासाठी मुलुंड चेकनाक्यापासून ओवळ्यापर्यंत महामार्गावर रस्ता अडवण्यात आला आहे. तसंच सेवा रस्त्याचाही काही भाग खोदण्यात आला आहे. त्यामुळं रस्ते अरूंद झाले असून मोठी वाहतूक कोंडी होत आहे. महापालिकेनंही मलनिस्सारण व्यवस्थेसाठी काही ठिकाणी रस्ते खोदले आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर पत्रे सरकवून रस्त्यांची रूंदी न वाढवल्यास महामार्ग आणि सेवा रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यातच सेवा रस्त्यावर उभी करून ठेवली जाणारी वाहनं यामुळं वाहतुकीला अडथळा होत आहे. पावसाळ्यापूर्वीच प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले असून ऐन पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे मोठ्या वाहतुक कोंडीला सामोरं जावं लागतं. त्यामुळं याबाबत तातडीनं पावलं उचलून सर्व खड्डे बुजवणं, जड वाहतूक वेळापत्रकानुसार नियंत्रित करणं, टोल जलद गतीनं वसूल करणं, सेवा रस्त्यांवरील पार्कींगवर बंदी घालणं, सेवा रस्त्यांवरील वाहतूक एकेरी करणं, मेट्रोचं काम पावसाळ्यापूर्वी थांबवणं, महामार्गावरील खाजगी बसेसला जागोजागी थांबण्यास मज्जाव करणं यासारखे उपाय तातडीनं अंमलात आणल्यास आगामी पावसाळ्यात ठाणेकरांना त्रास होणार नाही असं विक्रांत चव्हाण यांनी पालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.