मनसुख हिरेन काही गोष्टींस तयार न झाल्यामुळे त्यांची हत्या – किरिट सोमैय्या

मुकेश अंबानी यांच्या ॲन्टेलिया येथील निवासस्थानासमोर स्फोटकं ठेवण्यामागे मनसुख हिरेन यांचा हात होता असं भासवायचं होतं मात्र हिरेन याला तयार न झाल्यामुळं त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या किरिट सोमैय्या यांनी केला आहे. किरिट सोमैय्या यांनी मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. या सर्व प्रकरणामागे ज्येष्ठ भारतीय पोलीस सेवेतील अधिका-याचा हात असून त्याला मार्गदर्शन करणारंही कोणीतरी असावं. कारण सहाय्यक पोलीस निरिक्षक दर्जाचा अधिकारी असं काम करण्यास धजावणार नाही. मनसुख हिरेन यानं हे आरोप स्वीकारावे नंतर त्यांना बाहेर काढता येईल असा सचिन वाझे यांचा प्रयत्न होता. आरोप अंगावर घेतल्यानंतर काही दिवसांनी त्याला बाहेर काढता येईल असा डावही यामागे होता. पण मनसुख हिरेन यानं हे मान्य न केल्यामुळं त्याची हत्या करण्यात आली. हळूहळू हे सर्व बाहेर येईल असं सोमैय्या यांनी सांगितलं. या प्रकरणामागे भारतीय पोलीस सेवेतील एक वरिष्ठ अधिकारी असून त्यांना मुख्यमंत्र्याचा वरदहस्त असावा. सध्या हा आयपीएस अधिकारी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप किरिट सोमैय्या यांनी केला. या एकूण प्रकाराच्या तपासाला धक्का लावण्याचा प्रयत्न परमवीर सिंग करत असून त्यामुळं मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची हकालपट्टी करण्याची मागणीही किरिट सोमैय्या यांनी यावेळी केली. वाझे यांच्या अटकेनंतर आता हिरेन कुटुंबियांना थोडा विश्वास निर्माण झाला असून अजून त्यांच्या मनात अशी भीती आहे की यामागे आणखी कोणी आहे याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी किरिट सोमैय्या यांनी केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading