मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांच्या दालनात आयोजित केलेल्या बैठकीत खासदार राजन विचारे यांनी ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या समस्या मांडल्या. या बैठकीत विचारे यांनी ठाण्यातील रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचून रेल्वेकडून प्रवाशांसाठी जास्तीत जास्त सुविधा मागून घेतल्या. नव्याने आलेले मध्य रेल्वे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांना भारतातील पहिली रेल्वे सुरू झालेल्या ऐतिहासिक अशा ठाणे रेल्वे स्थानकाची ओळख पटवून दिली. तसेच मुंबईनंतर ठाणे हे रेल्वे स्थानक प्रवाशांकडून जास्तीत जास्त महसूल मिळवून देणारे रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे या ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व पश्चिम बाजूस अधिक लोकवस्ती असल्याने या ठाणे रेल्वे स्थानकाचा विस्तार होऊ न शकल्याने दररोज ७ ते ८ लाख प्रवासी हे स्थानक पेलु शकत नसल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना दमछाक करावी लागते.
यासाठी ठाणे मुलुंड दरम्यान मंजूर झालेल्या नवीन रेल्वे स्थानकाचे काम लवकरात लवकर सुरू करावे. त्यावर मध्य रेल्वेने स्थानकाच्या कामांसाठी 184 कोटी रक्कम आणि जागेची मालकी रेल्वेला मिळण्यासाठी ठाणे महापालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. तसेच विचारे यांनी गेल्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर रेल्वे लँड डेव्हलपमेंट या विभागाकडून ठाणे रेल्वे स्थानकात होणा-या विकास कामांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी रेल्वेने ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या संकल्पनेच्या आराखड्यात रूफ प्लाझा, निर्गमन/येणाऱ्या प्रवाशांना वेगळे करणे, वेटिंग हॉल, लिफ्ट आणि एस्केलेटरची तरतूद, बहुस्तरीय कार पार्किंग, मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट, कनेक्टिव्हिटी आणि इतर जागतिक दर्जाच्या सुविधांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच आरएलडीए कडून आराखडा अंतिम करण्यात येत आहे. डिझाईनचे काम पूर्ण झाल्यावर याचे पुन्हा सादरीकरण करून आपल्या सूचनांचा समावेश त्यामध्ये करण्यात येईल असे सांगण्यात आले तसेच खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रवाशांना या ठाणे रेल्वे स्थानकात सुरू होणाऱ्या विकास कामांचा त्रास होऊ नये यासाठी ठाणे मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती द्या असे सांगण्यात आले. यावेळी विचारे यांनी प्रवाशांच्या काही मागण्याही मांडल्या. ठाणे – वाशी हार्बर रेल्वे मार्गावर एसी लोकलची मागणी, तिकीट खिडकीत वाढ, तसेच UTS APP द्वारे काढण्यात येणाऱ्या तिकिटची जनजागृतीकरण करणे. कल्याण आणि मुंबई दिशेस सुरू असलेला पादचारी पूल लवकर मार्गी लावावा. लांब पल्ल्यांच्या गाड्यांना ज्या फलाटांवर थांबा आहे त्याठिकाणी सरकते जिने बसविण्याच्या मागणीला मंजुरी. वातानुकूलित शौचालय, फलाटावर महिलांसाठी स्वतंत्र शौचालय, दिव्यांगांसाठी शौचालयाची व्यवस्था यावर भर देण्याची मागणी. रेल्वे प्रवाशांसाठी थंडगार शुद्ध पाणी मिळावे, सीसीटीव्ही आणि पोलिस मनुष्यबळ यांच्यात वाढ करावी, रेल्वे हद्दीतील फेरीवाल्यांना रोखण्यासाठी धोरण निश्चित करा. दुचाकी आणि चार चाकी मल्टीलेवल पार्किंग इमारत उभी करा, लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा तसंच एलटीटी बनारस एक्सप्रेसला आगमन आणि प्रस्थाना दरम्यान ठाणे स्थानकावर थांबा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.