राज्यातील मंदिरे, गुरुद्वारा, जैन मंदिरांसह धार्मिक संस्था उघडण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ठाण्यात आज घंटानाद आंदोलन करण्यात आलं. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जनजीवन पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मास-मदिरा ‘पुनःश्च हरी ओम’ च्या नावाखाली सर्व काही चालू केले. मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात हरीला मात्र बंदिस्त ठेवले. केंद्र सरकारने मंदिरे उघडण्याचे निर्देश दिल्यानंतर, राज्यातील नागरिकांकडूनही मंदिरे उघडण्याची मागणी करण्यात आली. मात्र राज्य सरकारने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे झोपी गेलेल्या ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी राज्यातील संत, महंत, आचार्य, धर्माचार्य, धार्मिक, अध्यात्मिक आणि सांप्रदायिक क्षेत्रातील मंडळी यांच्याबरोबरच देवस्थाने, तीर्थक्षेत्रे येथील उदरनिर्वाह निगडीत असलेल्या व्यावसायिकांनी आज राज्यभर आंदोलन केलं. ठाण्यातील मुख्य आंदोलन कौपिनेश्वर मंदिरासमोर करण्यात आलं. शहरातील जवळपास २८ मंदिरांबाहेर ही आंदोलनं करण्यात आली. वागळे इस्टेटमध्ये एका ठिकाणी टाळांच्या गजरा बरोबरच घोषणांमध्येही घंटानाद करण्यात आला.