बारवी धरणाच्या आजूबाजूच्या गावांना सतर्कता बागळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बारवी धरण जवळपास पूर्ण भरलं असून काही वेळातच बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होणार असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून कळवण्यात आलं आहे. बारवी धरणाची पाणी पातळी दुपारी ३ वाजता ७२.१५ मीटर एवढी असून पाण्याची पातळी ७२.२० ते ७२.६० मीटर आल्यावर धरणाच्या स्वयंचलित गेटमधून विसर्ग सुरू होईल. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळं पाण्याची पातळी सतत वाढत आहे. त्यामुळे अंबरनाथ तालुक्यातील आस्नोली, राहटोली, चोण, सागाव, पाटीलपाडा, चांदप, पादीरपाडा, पिंपळोली, कारंद आणि चांदप पाडा आणि नदीकाठावरील इतर गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भातसा धरणातूनही पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. आज सकाळी ७ वाजता भातसा धरणाच्या पाण्याची पातळी १४१.३० मीटर एवढी झाली असून धरणातील पाण्याचा साठा वाढत आहे. त्यामुळं धरणातून २१२ क्युसेक्स पाणी सोडलं जाणार आहे. यामुळं भातसा नदीच्या तीरावरील शहापूर, मुरबाड रस्त्यावरील सापगाव तसंच नदीकाठावरील ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या काळात कोणीही वाहत्या पाण्यात प्रवेश करू नये असंही प्रशासनानं कळवलं आहे.