भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जुन्या बाजारपेठेतील व्यापारी आणि नागरिकांबरोबर थेट संवाद साधला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याबद्दल व्यापारी आणि नागरिकांनी आनंद व्यक्त केल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी बावनकुळे यांच्याकडे नागरिकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. भाजपाच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे शहर, कोपरी पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा आणि मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील ‘सुपर वॉरियर्स’ बरोबर संवाद साधला. त्यानंतर जुन्या बाजारपेठेतील व्यापारी आणि नागरिकांबरोबर नागरिकांची भेट घेतली. त्यानंतर तलावपाळी येथे चौक सभा घेऊन मार्गदर्शन केले. प्रसिद्ध मामलेदार मिसळ, भाजी मार्केट, स्थानिक दुकानांमध्ये जाऊन बावनकुळे यांनी व्यापाऱ्यांबरोबर चर्चा केली. तसेच काही घरांमध्ये नागरिकांची भेट घेतली. तब्बल ५०० वर्षांपासूनचे अयोध्येतील श्रीराम मंदिराचे स्वप्न पूर्ण होत असल्याबद्दल अठरा वर्षांच्या एका तरुणाने समाधान व्यक्त करून आपले पहिले मत नरेंद्र मोदींना देणार असल्याचे सांगितले. कोरोना आपत्तीनंतर सलग तीन वर्ष आम्हाला अन्नधान्य दिल्याबद्दल एका वृद्धेने धन्यवाद दिले. नागरिकांबरोबर संवाद साधल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी तलाव पाळी येथे चौक सभा घेऊन मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात राबविलेल्या योजना नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘घर चलो’ अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. तसेच ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा खासदार विजयी करण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन केले.