शहरात होत असलेली वाहतुक कोंडी, वाढते नागरीकरण, वाढणारी वाहनांची संख्या त्याचप्रमाणे महापालिका हद्दीत टोलनाक्यावर होणारी गर्दी, अवजड वाहने, यामुळे शहरातील रस्त्यांवर ताण वाढत आहे. परंतु त्यावर पर्याय दिले जात नाहीत. त्यामुळे ही वाहतुक कोंडी सोडविण्यास यावी अन्यथा वाहतुक शाखा कार्यालयाबाहेर आंदोलन केले जाईल असा इशारा महाविकास आघाडीने ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला. तसेच ठाणे, मुलुंड, ऐरोली येथील टोलनाक्यावर एमएच ०४ आणि ०५ या वाहनांसाठी टोल मुक्त करावेत अशी मागणी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली. ठाण्यातील महाविकास आघाडीकडून आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुहास देसाई, शिवसेना(उ.बा.ठा)प्रवक्ते चंद्रभान आझाद, काँग्रेस मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे,राहुल पिंगळे,बाळासाहेब भुजबळ,राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विक्रम खामकर,कॉंग्रेस नेत रमेश इदिसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.