शहरात बेकायदेशीरपणे होर्डिंग्ज लावून शहर विद्रुप करणाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने होर्डिंग्ज हटविण्याची कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. त्यानुसार कचराळी तलाव सर्कल येथे बेकायदेशीरपणे लावण्यात आलेल्या होर्डिंग्जवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. या होर्डिंग्जवर सामाजिक तेढ निर्माण करणारा मजकूर लिहल्याचे निदर्शनास येताच असे होर्डिंग्ज तात्काळ हटविण्यात आले. कचराळी तलाव येथील सिद्धीविनायक मंदिर प्रवेशद्वार येथे 6 बाय 8 फूट मोजमापाचा बेकायदेशीररित्या होर्डिंग लावून त्यावर ‘खाऊन खाऊन 50 खोके-माजलेत बोके, माजलेत बोके’ असा आक्षेपार्ह मजकूर लिहिलेला होता आणि त्याच्या शेजारीच 8 बाय 8 फूट मोजमापाच्या होर्डिंगवर’ भूखंडाचे श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का?’ असा मजकूर लिहून सामाजिक गटामध्ये जाणीवपूर्वक तणाव आणि तेढ निर्माण करणारा प्रकार अज्ञात व्यक्तींनी केला असल्याचे निदर्शनास आले. हे होर्डिग्ज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने ताब्यात घेतले असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.