यावर्षी मकरसंक्रांत १५ जानेवारीला – दा कृ सोमण

यावर्षी १४ जानेवारी रोजी रात्री ८ वाजून ४४ मिनिटांनी  सूर्य  निरयन मकर राशीत प्रवेश करणार असल्याने मकरसंक्रांती १५ जानेवारी रोजी आल्याचं पंचांगकर्ते दा कृ. सोमण यांनी सांगितले. तसेच त्यांनी मकर संक्रांती विषयक वैज्ञानिक माहितीही दिली. निरयन मकर संक्रांती दरवर्षी  १४ जानेवारीलाच येते हे खरे नाही. सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा मकर राशीत प्रवेश करीपर्यंत ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटे १० सेकंद एवढा कालावधी लागतो. त्यामुळे निरयन मकर संक्रांतीचा दिवस हा पुढे पुढे जात असतो. सन २०० मध्ये निरयन मकर संक्रांती २२ डिसेंबरला आली होती. सन १८९९ मध्ये १३ जानेवारीला आली होती. १९७२ पर्यंत मकर संक्रांती १४ जानेवारीलाच येत होती. २०८५ पर्यंत मकर संक्रांती कधी १४ ला तर कधी १५ जानेवारीला येत राहील. सन २१०० पासून निरयन मकर संक्रांती १६ जानेवारीला येणार आहे. ३२४६ मध्ये निरयन मकर संक्रांती  चक्क १ फेब्रुवारीला येणार आहे. त्यामुळे निरयन मकर संक्रांती  नेहमी १४ जानेवारीलाच येते हे खरे नाही. सन २०२४, २०२७ मध्ये निरयन मकर संक्रांती १५ जानेवारीला तर सन २०२५, २०२६, २०२९, २०३० मध्ये १४ जानेवारीला येणार आहे. आपली पंचांगे निरयन पद्धतीची असल्याने सूर्य  निरयन राशीत प्रवेश करतो त्यावेळी मकर संक्रांती साजरी करतो. सूर्याने जर रात्री मकर राशीत प्रवेश केला तर दुस-या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाते. दिनमान वाढत जाणे हे वाईट कसे म्हणता येईल ? तिळगूळ देऊन गोड बोलायला शिकविणारा हा दिवस वाईट कसा असू शकेल ? संक्रांतीदेवीने जर या दिवशी दुष्ट राक्षसाला ठार मारले असेल तर ते वाईट कसे असू शकेल ? मकर संक्रांतीचा सण हा अशुभ नाही. वाईट नाही. मकर संक्रांतीच्यावेळी अनेक खोट्या आणि चुकीच्या अफवा पसरविल्या जातात त्यावरही विश्वास ठेवू नका. अफवा पसरवू नका. मकर संक्रांती कोणालाही वाईट नसते हे सोमण यांनी सांगितले. मकर संक्रांती पुण्यकालात मातीच्या सुगडात ऊस, बोरे, शेंगा , गाजर, ओले हरभरे वगैरे त्यावेळी शेतात पिकणारे पदार्थ आणि तिळगूळ  दान देण्याची पद्धत आहे. तसेच मकर संक्रांतीला काळी वस्त्रे परिधान करण्याची पद्धत आहे. कारण हे दिवस थंडीचे असतात. काळ्या रंगाची वस्त्रे शरीर उबदार ठेवतात. गरोदर महिला, विवाहाच्या प्रथम वर्षी सूना,नूतन वर्षात बालके यांनाही काळी वस्त्रे आणि हलव्याचे दागिने घालून आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. थंडीच्या  दिवसात  तीळ आरोग्यास चांगले असतात. म्हणून तीळाचे पदार्थ करून खाण्यास सांगितलेले आहेत. ज्यांच्याशी वर्षभरात भांडण झाले असेल, अबोला धरला गेला असेल तर एकमेकांना तिळगूळ देवून मने एकत्र आणणारा, गोड बोला असा संदेश देणारा हा गोड सण आहे.
असे दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading