ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजु लागल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आता कंबर कसली आहे. गेली अनेक वर्षे ठाणेकरांना गृहीत धरून सत्ताकारण करणाऱ्या प्रस्थापित राजकिय पक्षांना धडा शिकवण्याचा चंग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बांधला असुन छोटे-मोठे पक्ष, इच्छुक तसेच समाजातील समाजसेवी प्रभुतीना सोबत घेऊन ‘ठाणे विकास आघाड़ी’ रिंगणात उतरवणार असल्याचे सुतोवाच अविनाश जाधव यांनी केले आहे. तसेच सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन जाधव यांनी केले आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, आगामी निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने उतरणार आहे. याच निवडणुकीत सत्ताधाऱ्यासह प्रस्तापित असलेल्या राजकीय नेत्यांना धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तयार असून ठाणे महापालिका निवडणुकीत ठाण्यात ‘ठाणे विकास आघाडी ‘ मैदानात उतरणार आहे. त्यामुळे ज्याना तिकट मिळणार नाही, जे इच्छुक उमेदवार आहेत अश्या सर्वांना एकत्र घेऊन ठाणे विकास आघाडी स्थापन करण्यात येणार असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या परवानगीने ठाण्यात विकास आघाडी स्थापन करण्यात येणार आहे. समाजात काम करत असणाऱ्या महत्वाच्या घटक, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश असणार आहे. आगामी पालिका निवडणुकीत ठाणे विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीचे मैदान गाजवण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन अविनाश जाधव यांनी केले आहे.