स्वच्छता हीच सेवा या ब्रीदवाक्यानुसार संपूर्ण भारत देशात स्वच्छता अभियान राबवण्यात येत असून प्रत्येक नागरिकानं स्वच्छता हा केंद्रबिंदू मानून काम केल्यास शहराचा निश्चित कायापालट होईल असं प्रतिपादन महापालिका आयुक्तांनी केलं. केंद्र शासनानं स्वच्छता मोहिम अधिक गतीमान करण्यासाठी स्वच्छता हीच सेवा हा विषय घेऊन मोहिम सुरू केली असून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असा उपक्रम राबवण्यात यावा अशाप्रकारच्या सूचना शासनानं दिल्या आहेत. ठाणे महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमाचा आढावा आणि स्वच्छता हीच सेवा यावर एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. आज अनेक कारणांमुळे जागतिक तापमानामध्ये वाढ होत आहे. हे रोखण्यासाठी प्लास्टीकमुक्त शहर पर्यायानं देश करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. नागरिकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी सार्वजनिक शौचालयं उपलब्ध आहेत. काळानुरूप अद्ययावत शौचालयांची निर्मिती करून यामध्ये वीज, पाणी आणि नियमित स्वच्छता यावर भर देणं आवश्यक आहे. कच-याचं संकलन करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचीही आवश्यकता आहे. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे उपक्रम राबवण्यात यावेत तसंच सर्वांनी जास्तीत जास्त पुढाकार घ्यावा आणि जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून ही मोहिम यशस्वी करावी असं आवाहनही महापालिका आयुक्तांनी केलं.