परिवहन विभागाचा प्रत्येक घराशी संबंध असतो. घरातील प्रत्येक व्यक्ती आपल्या दळणवळणाच्या गरजा भागवताना विभागाच्या वाहनांचा वापर करते. त्यामुळं परिवहन विभागाची नाळ ही सर्वसामान्यांशी जोडलेली आहे असं प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं. कल्याणमधील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचं भूमीपूजन रावते यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. वांगणी जवळ अतिवृष्टीमुळं आलेल्या पूराच्या पाण्यात अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवाशांना इच्छीत ठिकाणी सुखरूप पोहचवण्यासाठी एसटी आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या चालक आणि वाहक तसंच अधिका-यांचा दिवाकर रावते यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कल्याण शहारातील समस्यांचा उहापोह करून परिवहन मंत्री या समस्या निश्चित सोडवतील असा विश्वास आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.