नैसर्गिक आणि घटनात्मक हक्कापासून कोलबाड तलाव परिसरातील नागरिकांना वंचित ठेवल्याबद्दल त्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि हा तलाव नागरिकांसाठी खुला करावा अशी मागणी धर्मराज्य पक्षानं पालिका आयुक्तांकडे केली आहे. ठाणे महापालिकेनं तलावांचं सुशोभिकरण केलं. यामध्ये कोलबाड तलावाचंही सुशोभिकरण करण्यात आलं. महापालिकेनं तीन वेळा हा तलाव सुशोभित करण्यासाठी करोडो रूपये खर्च केले. पण नागरिकांना या तलावाचा आनंद लुटता आला नाही. ठाणे महापालिकेनं या तलावाच्या महत्वाच्या भागांभोवती अनेक टप-या बांधल्या आहेत. तलावाच्या दुस-या बाजूला पार्कींग आणि अन्य बाजूला खाजगी आणि बंदिस्त यामुळं सुशोभिकरणाचा फायदा फक्त कंत्राटदार, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेलाच पोहचतो असा प्रश्न उपस्थित केला. गेल्या २५ वर्षात ठाणे महापालिकेनं नागरिकांना नैसर्गिक हक्कापासून दूर ठेवलं. म्हणून महापालिकेनं या परिसरातील नागरिकांना किमान १ लाख रूपये नुकसान भरपाई म्हणून द्यावेत आणि तलाव सर्वांसाठी खुला करावा अन्यथा प्रतिदिन १०० रूपयाप्रमाणे नैसर्गिक हक्कापासून वंचित ठेवल्याबद्दल परिसरातील मुलांपासून वरिष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना भत्ता द्यावा अशी मागणी केली आहे. पोलीस दलास ज्याप्रमाणे २५ लाख रूपये दिले तेच अधिकार नैसर्गिक हक्कापासून वंचित ठेवलेल्या सामान्य नागरिकांसाठी द्यावेत अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.