नागरिकत्व सुधारणा कायदा हा अल्पसंख्याकांवरील अन्याय दूर करणारा कायदा असून त्याचा भारतातील मुस्लिम किंवा अन्य कोणत्याही धर्माच्या नागरिकांशी संबंध नसल्याचं भारतीय जनता पक्षाच्या केशव उपाध्ये यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नागरिकत्व सुधारणा कायद्याचा काँग्रेसनं खोटा प्रचार केला असून लोक आता उत्स्फूर्तपणे बाहेर येत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. कलम ३७० किंवा तिहेरी कायदा आणि आताचा नागरिकत्व सुधारणा कायदा याला काँग्रेसनं जातीय आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही उपाध्ये यांनी केला. नागरिकत्व सुधारणा कायदा हा कोणताही नवा कायदा नसून नागरिकत्व सुधारणा कायदा १९५५ मध्ये केलेली सुधारणा आहे. या कायद्यामुळे संविधानातील समानतेच्या तत्वाचे उल्लंघन होत नाही. घटनेने अनेक बाबतीत विविध धर्मियांसाठी विविध कायदे करण्याची परवानगी दिली आहे. भारतीय संविधान हे भारतीय नागरिकांसाठी आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशमध्ये मुस्लिम धर्मिय अल्पसंख्याक नाहीत त्यामुळं त्यांचा या कायद्यात समावेश करण्यात आला नसल्याचं केशव उपाध्ये यांनी सांगितलं.