धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नसलेल्या पण ऐन पावसाळ्यात एखादी इमारत धोकादायक स्थितीत आढळल्यास अशा इमारतींमध्ये राहत असलेल्या आणि समोर कोणताही पर्याय नसलेल्या कुटुंबांना प्रति महिना तीन हजार रूपये देण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. ही मदत पावसाळ्याच्या चार महिन्यांपुरतीच दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये मोबाईल व्हॅनवरील जाहिरातींना बंदी घालण्याचा निर्णयही पालिका आयुक्तांनी घेतला आहे. महापालिका दरवर्षी धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून घेते. या पार्श्वभूमीवर ऐन पावसाळ्यामध्ये एखादी इमारत धोकादायक म्हणून आढळल्यास अशा काही कुटुंबांसमोर कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यास अशा कुटुंबांना ही मदत दिली जाणार आहे. भाडेतत्वावरील घरांची कमतरता आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला सर्वसाधारण सभेनं मान्यता दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे.