राज्यभरात धार्मिक स्थळांवरील भोंग्यावरून उदभवलेल्या वादामुळे अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. याच पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पहाटेपासूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरु केली. सायंकाळी उशिरा ठाणे न्यायालयाने ठाण्यातील विविध ठिकाणावरून ताब्यात घेतलेल्या बारा पदाधिकाऱ्यांना अटी शर्तीसह जामीन मंजूर केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याबाबत दिलेल्या आदेशानंतर त्याचे ठाण्यात पडसाद उमटण्याची शक्यता ओळखून पहाटेच चितळसर – मानपाडा, कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यास सुरवात केली होती. या पदाधिका-यांना १३ दिवस पोलीस ठाण्यात दररोज हजेरी लावावी लागणार असून न्यायालयाच्या अटींचा भंग केल्यास १५ हजारांचा दंड ठोठावला जाणार असल्याची माहिती निकालानंतर अँड. ओंकार राजूरकर यांनी दिली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांतर्फे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार आवाजाच्या पातळीचा भंग होऊ नये याकरिता मशिदींसमोर आवाजाची पातळी तपासण्याचं कामही पोलीसांकडून केलं जात होतं.