कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये स्वतंत्र पाणी पुरवठा योजना उभारण्याच्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील ही गावे पाण्याच्या बाबतीत संपन्न होणार आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरी भागातील पाण्याचा प्रश्न मिटल्यानंतर शिंदे यांनी ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना राबवण्यावरलक्ष केंद्रित केले. त्या ठिकाणी पाणीपुरवठ्यासाठी अशा योजना मंजूर करून घरोघरी पाणी देण्याचा श्रीकांत शिंदे यांचा प्रयत्न आहे. इतकेच नव्हे तर मलंगगड भागात पाणी पोहोचवण्यासाठी लाखो रुपयांची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना श्रीकांत शिंदे यांनी मंजूर करून घेतली आहे. या मोहिमेचा पुढचा भाग कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांकडे पाहिले जात होते. कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध गावांच्या नळपाणी योजनेसाठी निविदा जाहीर केल्या जाणार आहेत. जिल्ह्यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील पिंपरी कर्म नगरी तर कल्याण तालुक्यातील खोणी, म्हारळ, पाली अशा एकूण चार योजनांस ५ कोटींची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. तसेंच जिल्हा परिषदेमार्फत २ कोटी पर्यंतच्या योजनांना तांत्रिक मान्यता देण्यात येते. तर २ कोटी पेक्षा जास्त किमतीच्या योजनांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तांत्रिक मान्यता देण्यात येते. त्या अनुषंगाने कल्याण तालुक्यातील म्हारळ खुर्द, वरप आणि कांबा अशा एकूण ११ कोटीच्या तीन योजनांचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनवून तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास सादर करण्यात आले आहेत. ५ कोटी पेक्षा जास्त किंमत असणान्या योजनांची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येते. अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजने अंतर्गत नेवाळी, मांगरूळ खरड, अशा तीन गावे आणि १४ पाडे मिळून साडेबारा कोटी रकमेच्या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून पुढील अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडे सादर करण्यात आला आहे. या योजनेस सुद्धा तांत्रिक मान्यता देण्याची कार्यवाही सुरू आहे, असेही श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.