जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं चांगलाच जोर धरला आहे. यामुळं धरणांच्या पाणी साठ्यातही चांगलीच वाढ झाली आहे. असं असलं तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये ५ ते १० टक्के पाणी साठा कमी असल्याचं दिसत आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला भातसा, बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ५८ मिलीमीटर पाऊस झाला. यामुळं धरणाच्या पाणी साठ्यात चांगली वाढ झाली आहे. सध्या धरणामध्ये ४२ टक्के पाणी साठा आहे. बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही ८६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळं बारवी धरणाच्या पाणी साठ्यातही वाढ झाली असून बारवी धरणात ४२ टक्के पाणी साठा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात भातसा धरणात जवळपास ४६ टक्के तर बारवी धरणात ५३ टक्के पाण्याचा साठा होता. त्या तुलनेत हा पाणी साठा कमी आहे. असं असलं तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळं पाणी टंचाईची तलवार लवकरच दूर होण्याची शक्यता आहे.