ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये आता मुबलक पाणी साठा झाल्यामुळे पाणी टंचाईची टांगती तलवार दूर झाली आहे. गेले काही दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे धरणं भरून वाहू लागली आहेत. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला भातसा आणि बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. भातसा धरणात ८८ टक्के पाणी साठा असून बारवी धरणात १४१ टक्के पाण्याचा साठा झाला आहे. भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ९४२ दशलक्ष घनमीटर असून सध्या धरणामध्ये ८३७ दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे. तर बारवी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता २३३ दशलक्ष घनमीटर असून या धरणात सध्या ३२९ दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे. अलिकडेच बारवी धरणाची उंची वाढवण्यात आली होती. त्यात यंदापासून पाणी साठायला सुरूवात झाली आहे.