ठाण्यामध्ये गेले तीन दिवस पाऊस कोसळत असून गेल्या २४ तासात ठाण्यात ८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शनिवारपासून पावसानं नुसता धुमाकूळ घातला आहे. कालच्या २४ तासात जवळपास २७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. या पावसामुळे जवळपास ६० हून अधिक ठिकाणी पाणी साचलं होतं तर आज ७१ ठिकाणी झाडं पडली. यामुळं काही ठिकाणी वाहनांचं नुकसान झालं. शहरात ११ ठिकाणी झाडं पडल्याच्या तक्रारी होत्या. तर पाचपाखाडी, घोडबंदर, मुंब्रा, दिवा, कासारवडवली, चरई, तलावपाळी, बाळकूम पाडा नंबर ३, ढोकाळी, खारेगाव, ठाणे कारागृह, मनोरमानगर, वसंतलिला, दौलतनगर, रशिद कंपाऊंड, वर्षा-वंदना सोसायटी, कळवा प्रभाग कार्यालय, हनुमान मंदिर कोपरी, माजिवडा, म्हात्रे चाळ दिवा, दादलानी पार्क, गणपती कारखाना, नौपाडा, सामंतवाडी उथळसर, महाराष्ट्रनगर बाळकूम पाडा नंबर १, त्रिमूर्ती सोसायटी, नागला बंदर, साबेगाव दिवा, खारेगाव विसर्जन घाट, चरई, पडले गाव, आंबेघोसाळे तलाव अशा ४० हून अधिक ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी होत्या. वेधशाळेनं आज आणि बुधवारी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे.