देशात अराजकता माजवण्याचा आणि देशाला बदनाम करणाऱ्या ‘केरळ स्टोरी’ या सिनेमाच्या निर्मात्याला फाशी दिली पाहिजे हे आपले विधान संतापाचा कडेलोट होता. आपणाकडून व्यक्त झालेला शाब्दिक संताप होता. देशात धार्मिक विद्वेष पसरविणार्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असे आपले मत आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केले.
दिल्लीमध्ये कधीही गेलात; कुठल्याही कार्यालयात जा, कुठल्याही मंत्रालयात, कुठल्याही मंत्र्यांच्या कार्यालयात जा; चार खासगी सचिवांमधील एक खासगी सचिव हा “मल्लू” असतो. म्हणजेच तो केरळमधून आलेला असतो. आज केरळ भारतातील पूर्ण साक्षर राज्य म्हणून पुढे येतंय. आज तिथे ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम हे तिघेही संख्येने कमी अधिक प्रमाणात सारखेच असले तरी तिथे कधीही टोकाचे जातीयवाद झाल्याचे दिसत नाही. आजमितीला तिथे बालमृत्यूचा दर फक्त सहा आहे. उलट उत्तर प्रदेशात 46 आहे. दूरदेशातून जे परकीय चलन भारतात येते. त्यातील 36 टक्के चलन हे केरळमधील परदेशी असलेले अनिवासी भारतीय पाठवतात. मागच्या वर्षी त्यांनी 2.34 लाख कोटी रूपये पाठविले होते. दरडोई उत्पन्न हे भारताच्या सरासरीपेक्षा 60% अधिक आहे. याचा अर्थ तेथील माणूस हा इतर राज्यातील नागरिकांपेक्षा श्रीमंत आहे. दारिद्रय़रेषेखालील भारताची सरासरी जेव्हा 22 आहे. तेव्हा तिथे फक्त 0.76 लोकं हे दारिद्रय़रेषेखाली आहेत. समुद्र किनाऱ्याचा विकास सर्वाधिक केरळने केलाय. खाडीमध्ये पर्यटन ही संकल्पनाच केरळमधून आलीय. अशा केरळला आणि आपल्या देशाला बदनाम करण्यासाठी केरळ स्टोरी हा सिनेमा आता प्रदर्शित झाला आहे, 32 हजार मुलींचे धर्मांतर किंवा पलायन हा निव्वळ खोटारडेपणा आहे. कारण अधिकृत आकडा फक्त तीन आहे. आपल्या बहिणींबद्दल आपण संशय निर्माण करतो. आपल्या भगिनींना मूर्खात काढणे, त्यांना अक्कलच नाही, असे दाखवतो. तेव्हा ही पुरूषप्रधान संस्कृतीचा आपल्यावर किती पगडा आहे, हेच आपण दाखवून देत असतो. याबाबत माझ्या भावना खूप उग्र आहेत. आपल्या देशाला जगभरात बदनाम करतात आणि नंतर बेशरमपणे कोर्टात सांगतात की 32 हजार नाहीत तीनच आहेत. सिनेमा काल्पनिक होता म्हणून आपण 32 हजार मुलींनी धर्मांतरण केले, असे कोर्टात सांगतात. अशावेळेस बोलताना आपण त्याला फाशी दिली पाहिजे, असे म्हटले. त्याचा शब्दशः अर्थ घेऊन अनर्थ करण्यात आला. या एका वाक्यावर वाद निर्माण करायचे, असे प्रकार करण्यात येत आहेत. या सिनेमाने देशाची बदनामी केली आहे, याची दखलच कोणी घेतली नव्हती. नशिब आपण ते विधान केले म्हणून या सिनेमातील चुकीच्या गोष्टी समोर आल्या. त्यातून आपण ते विधान केले. तुम्ही ते प्रचंड गांभीर्यपूर्वक घेतले. त्याबद्दल प्रसारमाध्यमांचे आभारच मानले पाहिजेत. आता महाराष्ट्रासह पूर्ण देशाला कळेल की राजकीय पक्ष नेमके करताहेत काय? सिनेमा बघायला सांगताहेत, पण, त्या आधी 32 हजार मुली आहेत हे सिद्ध करून दाखवा ना! मी असे विधान का केले, यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. पण मी जाहीरपणे सांगतो की बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा संविधानप्रेमी नागरिक आहे. या सिनेमाचा टीझर पहा, त्यामधून तो निर्माता खोटी माहिती देशभर पसरवत आहे. त्यामुळेच त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. आज मणीपुरमध्ये सिव्हिल वॉर सुरू झाले आहे. ते आपण दाखवत नाही. पण आपण हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करण्यात धन्यता मानत आहोत. त्यातून मते मिळणार आहेत, म्हणून जगात काय चाललंय या पेक्षा हिंदू-मुस्लीम वाद अधिक पेटवला जात आहे. का लोकांच्या मनात द्वेष निर्माण करीत आहात. कोणा एका मुलीने चूक केली असेल तर सर्व महिलांना का बदनाम करतात? कोण मोफत सिनेमा दाखवतोय, याच्याशी आपणाला देणेघेणे नाही. पण, या देशाबद्दल बोलतोय. या देशात काही लोकांना काय घडवायचे आहे, ते मी सांगतोय. तीन चे 32 हजार करून केरळ आणि देशाची प्रतिमा मलिन करणाऱ्यावर कोणीही बोलायला तयार नाही, हे कसे चालेल? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.