दीड दिवसांच्या गणपती विसर्जनात १० टन निर्माल्य संकलित

समर्थ भारत व्‍यासपीठ आणि ठाणे महापालिकेच्‍या संयुक्‍त विदयमाने गणेशोत्‍सव काळातील निर्माल्‍याचे संकलन करणे आणि त्‍याची शास्‍त्रोक्‍त विल्‍हेवाट लावणे या अभियानाने यंदा १२ व्‍या वर्षात पदार्पण केले असुन दिड दिवसाच्‍या गणपती विसर्जनात जवळपास १० टन निर्माल्‍य संकलित करण्‍यात आले आहे. कृत्रिम तलावाचा प्रयोग ठाण्‍याने महाराष्‍ट्राला दिला त्‍यासोबत तलावांचे शहर असलेल्‍या ठाण्‍याने गणपती काळातील निर्माल्‍य व्‍यवस्‍थापनासाठी गेल्‍या बारा वर्षांपासुन महानिर्माल्‍य व्‍यवस्‍थापन अभियान राबविले आहे. शहरातील जवळपास ७ विसर्जन घाटावर दरवर्षी सफाई सेवक आणि कार्यकर्त्‍यांच्‍या माध्‍यमातुन गणेश भक्‍तांकडून निर्माल्‍य तसंच सजावटीचे साहित्‍य संकलित केले जाते. विसर्जन घाटावर तैनात करण्‍यात आलेल्‍या वाहनांमध्‍ये या निर्माल्‍याचे जैविक -अजैविक असे वर्गीकरण केले जाते. वर्गिकृत कचरा समर्थ भारत व्‍यासपीठाच्‍या संयुक्‍त कचरा व्‍यवस्‍थापनावर पाठवला जातो. जैविक कच-यातुन खत निर्मिती केली जाते तर अजैविक कच-यात असलेल्‍या प्‍लास्‍टीक, कागद, पुठठा, काच, कागद सारखे घटक देखील संस्‍थेच्‍या प्रकल्‍प पुर्ननिर्माणमध्‍ये शास्‍त्रोक्‍त विल्‍हेवाटीसाठी पाठवले जातात. शहरातील सफाई सेवक, महिला, संस्‍थेचे कार्यकर्ते गणेशोत्‍सव अधिक पर्यावरण पुरक व्‍हावा यासाठी जन जागृती करत असतांनाच प्रत्‍यक्ष निर्माल्‍य संकलन आणि त्‍याची शास्‍त्रोक्‍त विल्‍हेवाट लागावी म्‍हणून एक महिना या महानिर्माल्‍य अभियानात कार्यरत असतात. दिड दिवसाच्‍या विसर्जनात जवळपास १० टन निर्माल्‍य संकलित करण्‍यात आले आहे. थर्माकोल, प्‍लास्‍टीकचा वापर ९५ टक्‍के कमी झालेला यावर्षी दिसला अशी माहिती संस्‍थेच्‍यावतीने देण्‍यात आली. संपुर्ण गणेशोत्‍सवात किमान १०० टन निर्माल्‍य संकलित होईल असा अंदाज संस्‍थेच्‍या वतीने व्‍यक्‍त करण्‍यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading