तृणपुष्प सोसायटीच्या पुर्नविकासाच्या १० वर्षांपासून रखडलेल्या प्रस्तावाला वेग देऊन लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी नारायण पवार यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे केली आहे. पाचपाखाडीतीलल तृणपुष्प हौसिंग सोसायटी १९७७ मध्ये स्थापन झाली. या सोसायटीत ५७५ हून अधिक कुटुंबं राहतात. त्यात बहुतांशी रिक्षा चालक, सुरक्षा रक्षक यांच्यासह हातावर पोट असलेल्या मजुरांचा समावेश आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी पुष्पक डेव्हलपर्सतर्फे झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्यात येऊन तत्कालीन झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये प्लॅन सादर करण्यात आला होता. तर या प्लॅनला ठाणे महापालिकेनेही मंजुरी दिली आहे. पुष्पक डेव्हलपर्सच्या दिरंगाई आणि दुर्लक्षामुळे दहा वर्षांनंतरही इमारतीचे काम पूर्ण झालेले नाही. रहिवाशांना पहिल्या तीन वर्षांसाठी ३ हजार १०० रुपये भाडे दिले जाणार होते. मात्र काम रखडल्यामुळे बिल्डरने आणखी दोन वर्षांसाठी १९०० रुपये वाढवून एकूण ५ हजार रुपये भाडे देण्यास सुरुवात केली. पुन्हा काही महिन्यांनंतर एकूण सात हजार रुपये भाडे निश्चित केले. सात वर्षांत केवळ भाडे मिळते, यावरच रहिवाशांना समाधान मानावे लागले. गेल्या चार महिन्यांच्या काळात बिल्डरकडून रहिवाशांना घरभाडेही नाकारण्यात आले. एकीकडे हक्काच्या घरापासून दूर ठेवले जात असताना, भाड्याच्या घरासाठीही रहिवाशांना पैसे न देता अन्याय करण्यात आला. त्यामुळे रहिवाशांमध्ये अस्वस्थता असून तीव्र आंदोलनाची तयारी केली जात आहे. तरी या प्रकरणी लक्ष घालून लवकरात लवकर सुनावणी घेऊन रहिवाशांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा स्वत: पुढाकार घेऊन झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने हा प्रकल्प ताब्यात घेऊन पूर्ण करावा अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे.