डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानातर्फे पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रायलादेवी तलाव येथे गणेश मूर्ती विसर्जनाचे औचित्य साधून निर्माल्यापासून खत बनवण्याचा उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम राबवण्याचा मुख्य उद्देश जल प्रदूषण टाळणे हा होता. या उपक्रमात श्री सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. साधारण १७५२ गणेश मूर्तींचे विसर्जन यावेळी करण्यात आले. त्यातून २ हजार ६३७ किलो निर्माल्य श्री सदस्यांनी एकत्र करून खत बनवण्यासाठी केलेल्या खड्ड्यात गोळा केले. या निर्माल्यापासून खत बनवण्यात येणार असून या खताचा वापर रायलादेवी परिसरात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे लावण्यात आलेल्या ९०० झाडांच्या संवर्धनासाठी करण्यात येणार आहे. अनंत चतुर्दशीलाही असा उपक्रम राबवला जाणार आहे.