अवाजवी वीज बिलांमुळे आधीच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे जनता हवालदिल झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला अवाजवी बिले पाठवू नका, त्यांची वीज खंडीत करु नका, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे. अवाजवी वीजबिलांविरोधात संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली लोकचळवळ सुरु करण्यात आली आहे. याबाबत याचिकाही दाखल करण्यात आली आहे. केळकर यांनी आतापर्यंत सहा ठिकाणी बैठका घेतल्या आहेत. काल बाळकूम येथील गृहसंकुलांच्या प्रतिनिधींची बैठक केळकर यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी वीज मंडळ अधिकारी उपस्थित होते. अधिका-यांनी ग्राहकांच्या तक्रारीबाबत मार्गदर्शन केले. शिबिर आयोजित करुन वीज बिलांची तपासणी करण्यात येईल असे अधिक-यांनी सांगितले. वीज ग्राहकांना दिलासा देण्याचे काम वीज मंडळाने सुरु केले आहे. या बैठकीत वीज बिले दूरुस्त करा, वीज खंडीत करु नका, वीज बिलात सवलत द्या, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. दंड आणि व्याजाची आकारणी करण्यात येणार नाही, असे अधिका-यांनी बैठकीत सांगितले. वीज मंडळाने तीन हप्त्यात बिल भरण्याची सवलत दिल्याची माहिती संजय केळकर यांनी दिली.