ठाण्यात प्रथमच सोलापूर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून येत्या १७ ते १९ मे पर्यंत हायलँड मैदानावर हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शेंगा, चटणी, कडक भाकरी, लांबोटीचा चिवडा वा हुग्गी अशा चटकदार पदार्थांच्या आस्वादाबरोबरच सोलापूरची चादर, सतरंजी, हातमागावरील साड्या अशा एकापेक्षा एक वस्तू ठाणेकरांना एका छताखाली खरेदी करता येणार आहेत. सोलापूर सोशल फौंडेशनतर्फे या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवामध्ये दीडशेहून अधिक उत्पादनांसह उद्योजक सहभागी होणार आहेत. सोलापूरमधील विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळावी आणि स्थानिक व्यापा-यांना रोजगार मिळावा या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. उत्पादक आणि ग्राहकातील दलालाची साखळी मोडून थेट माल ग्राहकांच्या हातात येत असल्यानं या महोत्सवात वाजवी दरात वस्तू उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. सोलापूरमधील काही मंदिरांच्या प्रतिकृती, सामुहिक अग्निहोत्र, प्रवचन, भारूड अशा अध्यात्मिक कार्यक्रमाबरोबरच लावण्याही सादर केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील मान्यवरांचा श्रीमंती सोलापूरची असा पुरस्कार देऊन गौरव केला जाणार असल्याचंही सुभाष देशमुख यांनी सांगितलं.