ठाण्यात सध्या तापमानात चांगलीच वाढ झाली असून तापमानाचा पारा ४० अंशावर जात आहे. तापमानाचा पारा कमालीचा वाढल्यामुळे असह्य उन्हाचे चटके बसत आहेत. मंगळवारी आणि बुधवारी तर तापमानाने उच्चांक गाठला असून पारा चाळीशी पार गेल्याचं दिसून आलं. ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाळा खूपच जाणवू लागला असून भर उन्हातून कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना उन्हाळ्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा जाणवत असल्यामुळे छत्री, टोपी, गॉगल याचा वापर करताना नागरिक दिसत आहेत. अंगाची लाहीलाही होणा-या या उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी उसाचा रस, ताक, लिंबू सरबत अशा थंड पेयांच्या दुकानात गर्दी होत असल्याचं दिसत आहे.