एकनाथ शिंदे यांनी आघाडी सरकारमधून फारकत घेतल्यापासून शिंदे यांना ठाण्यातील बहुतांश शिवसैनिकांकडूनही पाठिंबा मिळत असल्याचंच दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आघाडी सरकारमधून फारकत घेतल्यामुळे राजकीय वर्तुळ ढवळलं गेलं आहे. मुंबईमध्ये काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या नावानं खडे फोडले जात असले तरी ठाण्यात मात्र शांत वातावरण आहे. ठाण्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते हे बहुतांशपणे एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी असल्याचंच दिसत आहे. त्याचं प्रतिबिंब सामाजिक संकेतस्थळांवर दिसत आहे. सामाजिक संकेतस्थळांवर अनेकांनी पाठिंबा दर्शवत पोस्ट टाकल्या आहेत. ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवणारे फलक लागले आहेत. मात्र आत्तापर्यंत तरी कुठेही एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेविरोधात जाहीर मतप्रदर्शन झाल्याचं दिसलेलं नाही.