ठाण्यातील रस्त्यांची झालेली दुर्दशा पाहून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंब्रा बाह्यवळण रस्तामार्गे जितेंद्र आव्हाड ठाण्यात येत असताना त्यांनी या रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेबद्दल नाराजी व्यक्त केली. गेले काही दिवस पावसानंही चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांची दुर्दशा उडाली आहे. त्याचाच अनुभव आमदार जितेंद्र आव्हाड यांना आला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यातील पहिल्या बैठकीत रस्त्यांबाबत सूचना दिल्या होत्या. पण त्याकडे फारसं लक्ष दिल्याचं दिसत नाही. मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावरून येताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्याला काही ठिकाणी खड्डे पडल्याचं त्यांना दिसलं. एका ठिकाणी तर रस्त्याच्या सळयाही बाहेर आल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करावी अन्यथा एखादा अपघात होण्याची भीती आव्हाड यांनी व्यक्त केली.