ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते हणमंत जगदाळे यांनी पक्षातील स्थानिक नेतृत्वावर टीकेची तोफ डागत गटनेते पदाचा राजीनामा दिल्यानं ठाण्यातही राष्ट्रवादीमध्ये फुटीचं बीज पडल्याचं दिसत आहे. काल त्यांनी एका पत्रकार परिषदेत पक्षाच्या गटनेते पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. विरोधी पक्षनेते मिलिंद पाटलांच्या कार्यपध्दतीमुळे पक्ष कमकुवत होत असल्याची टीका करत त्यांनी हा राजीनामा दिला. आपण दुस-या कोणत्याही पक्षात प्रवेश करायचा निर्णय घेतलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. महापालिकेत विविध निर्णय घेताना विरोधी पक्षनेत्याकडून पक्षातील नगरसेवक आणि गटनेत्यांना विश्वासात घेतलं जात होतं. मात्र गेल्या २ वर्षांपासून मिलिंद पाटील यांनी व्यक्ती केंद्रीत कामकाज करण्याचा उपक्रम हाती घेतल्याचा आरोप जगदाळे यांनी यावेळी केला. समूह विकास योजनेमध्ये संपूर्ण प्रभागाचा समावेश करण्यात आला होता मात्र नंतर ठरावात बदल करून त्यातून शास्त्रीनगर विभाग वगळण्यात आला. या ठरावावर विरोधी पक्षनेत्यांची स्वाक्षरी असून त्यामुळं प्रभागात काम करणं कठीण झाल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. तर जगदाळे ज्या ठरावाबाबत बोलत आहेत त्या जमिनीचे मालक परेरा हे आहेत. समूह विकास योजनेत विकासाचा अधिकार जमिन मालकाला आहे. पण त्यामुळेच जगदाळे यांचं गणित बिघडलं असल्यानं त्यांनीही आरोप केल्याचा आरोप मिलिंद पाटील यांनी केला आहे. हणमंत जगदाळे यांना सत्तेतून पैसा आणि याच पैशातून सत्ता मिळवायची असल्याचा पलटवारही मिलिंद पाटील यांनी केला.