ठाण्यातील आनंदीबाई केशव जोशी शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागात टाळ वाजवून गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणरायाचं स्वागत करण्यात आलं. गणपती हे सर्वांचं आराध्य दैवत. लहानांचा लाडका बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा. गणेश चतुर्थीला आगमन झालेला गणराया अनंत चतुर्दशीला आपला निरोप घेतो. गणेशोत्सव सजावटीपासून विसर्जनापर्यंत पर्यावरणपूरक पध्दतीनं कसा साजरा केला जाऊ शकतो याचा संदेश मुलांना देण्यासाठी शाळेत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गणपतीची मूर्ती शाडूची असावी, सजावट सुध्दा फुलं, कागद, साड्या अशा पर्यावरण स्नेही वस्तूंनी केली जावी असा संदेश यावेळी देण्यात आला. शाळेतील शिक्षकांनी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करून आरती केली आणि घरातील बादलीत विसर्जन करून ते पाणी झाडांना घालून मातीचा उपयोग करावा यामुळं नदी, समुद्राचं पाणी स्वच्छ राहण्यास मदत होईल हे मुलांना कृतीतून समजावून दिले.