श्रावण महिना म्हटलं की सणांची उधळण असते. श्रावणातील अमावास्येला बैलपोळा साजरा केला जातो. बैलपोळा हा विशेषत: शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. पोळ्याचं महत्व हे शेतकरी वर्गात जास्त आहे. शेतक-याच्या दृष्टीनं बैलाचं महत्व मोठं आहे. त्यामुळं आजच्या दिवशी बैलाला मान दिला जातो. आजच्या दिवशी बैलाला बैलगाडी अथवा नांगराला जुंपलं जात नाही तर त्याची पूजा केली जाते. बैलाला सकाळी सकाळी आंघोळ घालून त्याची पूजा केली जाते. नैवेद्य म्हणून बैलांना पुरणपोळीही दिली जाते. त्यानंतर गावातून सजवलेल्या बैलांची मिरवणूकही काढण्याची प्रथा आहे. शेतक-यांचा जिव्हाळ्याचा सण म्हणून बैलपोळा पारंपरिक पध्दतीनं साजरा केला जातो.