ठाणे रेल्वे स्थानकातील शेकडो वर्ष जुन्या विहीराचा इतिहास उलगडला जाण्याची शक्यता आहे. ठाण्यात पहिली रेल्वे सुरू झाली त्यावेळी ठाणे स्थानकाच्या उभारणी दरम्यान प्रवाशांकरिता पिण्याचे पाणी मिळावं यासाठी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला विहीर बांधण्यात आली होती. या शेकडो वर्ष जुन्या विहीराचा इतिहास नामशेष होण्याच्या मार्गावर होता. यामुळं मध्य रेल्वे सल्लागार समितीचे माजी सदस्य अमोल कदम यांनी आमदार संजय केळकर यांच्याशी संपर्क साधला आणि आमदार केळकर यांनीही तात्काळ रेल्वे स्थानक परिसरात जाऊन रेल्वे अधिका-यांसमवेत विहीरीची पाहणी केली. ही विहीर साफ करून तिचे पाणी रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ करण्याकरिता वापरता येईल असं केळकर यांनी सांगितलं. ठाणे रेल्वे स्थानक परिसराची बांधणी ब्रिटीश काळात करण्यात आली होती. त्यावेळी स्थानकाच्या पूर्वेला प्रवाशांना पाणी पिण्याकरिता ही विहीर बांधण्यात आली होती. या विहीरीकडे दुर्लक्ष झाल्यानं ही विहीर बुजण्याच्या अवस्थेत आली होती. विहीरीवर पत्रे टाकून विहीर बंद करण्यात आली होती. त्यामुळं केळकर यांनी या परिसराची पाहणी करून विहीर स्वच्छ करण्याची सूचना रेल्वे अधिका-यांना केली. ही विहीर स्वच्छ करून या विहीरीतील पाण्याचा उपयोग फलाट स्वच्छ ठेवण्याकरिता, शौचालय स्वच्छ करण्याकरिता तसंच स्थानक परिसरातील झाडांना पाणी देण्याकरिता वापरता येईल. या विहीरीबाबत मध्य रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापकांनाही पत्र देणार असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं.