राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या महिला धोरणाला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने विविध क्षेत्रामध्ये आपल्या कतृत्वाचा झेंडा रोवणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री असताना पवार यांनी 1993 मध्ये महाराष्ट्रात राज्य महिला आयोग स्थापन करुन देशातील पहिले महिला धोरण तयार केले. या महिला धोरणात महिलांची सामाजिक स्थिती आणि प्रतिष्ठा सुधारणे, त्यांची मानहानी करणार्या प्रथांवर प्रतिबंधात्मक उपाय सुचवणे, महिलांसाठी असणार्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, महिलांना समुपदेशन आणि नि:शुल्क कायदेशीर सल्ला देणे यावर भर दिला होता. त्यांनी राबविण्यास सुरुवात केलेल्या या धोरणाला आता 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ गुणवंत महिलांचा सत्कार समारंभ आ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर महिलाध्यक्षा सुजाता घाग यांच्या नेतृत्वाखाली तसेच समाजसेविका ऋता आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला होता. महापौर मिनाक्षी शिंदे यांचा महापौर कार्यालयामध्ये जाऊन ठाणे शहर महिला अध्यक्ष सुजाताताई घाग नगरसेविका अपर्णा साळवी आणि राधताई जाधवर यांनी सत्कार केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये पॉवर लिफ्टींग अंतर्देशिय आणि कॉमनवेल्थ स्पर्धा गाजवणारी ठाणेकर सुश्मिता देशमुख, महाराष्ट्रातील प्रथम महिला एन. एम. एम. टी. बसचालक चित्रा शेट्ये , महिला रिक्षा चालक प्रज्ञा पारकर ,एन. एम. एम. टी. वाहक अनिता मोटे महिला रिक्षा चालक सुनिता पाटील , महिला रिक्षा चालक सुचिता चव्हाण , नगरसेविका अपर्णा साळवी, राधाबाई जाधवर, आरती गायकवाड, वर्षा मोरे, अंकिता शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.