युवक काँग्रेसनं बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करून केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकारला घेरण्याची रणनिती आखली आहे. रोजगार कुठे आहे असा प्रश्न उपस्थित करत युवक काँग्रेसनं खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी मोहिम सुरू केली आहे. राज्यामध्ये युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम राबवण्यात येणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राहिल हाम्फी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय बेरोजगारी नोंदणी असं या मोहिमेचं नाव आहे. राष्ट्रीय स्तरावर बेरोजगारीची नोंदणी करावी अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे. यासाठी युवक काँग्रेसनं ८१५१९ ९४४११ या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल देऊन बेरोजगारांनी समर्थन द्यावं असं आवाहन करण्यात आलं आहे. या माध्यमातून बेरोजगारीच्या मुद्यावर सोशल मिडीयाद्वारे केंद्र सरकारला थेट जाब विचारला जाणार असल्याचं राहिल हाम्फी यांनी सांगितलं.