ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकवू असे वचन खासदार राजन विचारे यांनी वचन दिले
आहे. खासदार राजन विचारे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आवाज एकनिष्ठेचा या आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी संपूर्ण ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या शहरातून निष्ठावंत शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदवून खासदार राजन विचारे यांना शुभेच्छा दिल्या. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी आणि शहापूर येथे घडलेल्या समृद्धी महामार्गावरील दुर्दैवी अपघातामुळे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचा वाढदिवस केक न कापता व फुलगुच्छ न स्वीकारता अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय महासचिव डॉ. जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण हे आवर्जून उपस्थित होते.
राजन विचारे यांनी यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या ठाणेकर शिवसैनिकांचे भरभरून कौतुक केले. शिवसेनेतून फुटून गेलेल्यांना ठाणेकर जनता माफ करणार नाही आणि त्यांना जरूर धडा शिकवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकारने आज निवडणुका जाहीर केल्या तर जनता नेमकी कोणाच्या बाजूने आहे हे सत्य बाहेर येईल त्यामुळे तेवढी हिंमत घाबरलेले सरकार दाखवत नाहीये अशी टीका राजन विचारे यांनी केली. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फुटून गेलेल्या नेत्यांची नावे न घेता खरपूस समाचार घेतला आहे जे सोडून गेले त्यांनी आपले कोणाचे बोट धरून राजकारणात आलो आणि यशस्वी वाटचाल केली याचा पण विचार केला नाही अशी टीका त्यांनी केली. पक्ष सोडून गेलेल्यानी आपल्याला काहीच मिळाले नाही असे छाती ठोकपणे सांगावे परंतु ते सांगण्याची त्यांच्यात हिंमत नाही असा टोला देखील लगावला. राजन विचारे एक निष्ठावंत शिवसैनिक असून आपला नेता आजारी असताना त्यांनी त्याची साथ सोडली नाही. त्याचा आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. आपण काँग्रेस विचाराचे आणि शरद पवारांचे निष्ठावंत असलो तरीही या ठाणे महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकू असे वचन दिले आहे.