आजच्या बदलत्या युगात, माहिती तंत्रज्ञानाच्या काळात विकासाच्या संकल्पना, माध्यमे बदल आहेत. अशा या काळात महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी जनसेवेवर भर देऊन नागरिकांना सेवा देण्याचे काम अविरतपणे सुरू ठेवावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले. महसूल दिनानिमित्त जिल्ह्यात आयोजित महसूल सप्ताहाच्या मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी शिनगारे बोलत होते. अपर जिल्हाधिकारी श्रीमती जायभाय यांनी आतापर्यंत अनुभवलेल्या महसूल विभागाच्या आठवणी सांगून म्हणाल्या की, महसूल दिन हा आपल्या कामांचे सिंहावलोकन करण्याचा दिवस आहे. महसूल विभाग म्हणून आपण लोकाभिमुख झालो आहोत का याचा विचार प्रत्येकाने करावा. या विभागाला मानवी चेहरा देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.महसूल सप्ताहानिमित्त देण्यात येणाऱ्या विविध सेवा आणि त्यासंबंधी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती असलेल्या घडी पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. गेल्या वर्षभरात विविध उपक्रम, योजना राबवून जिल्ह्यातील महसूल, जिल्हा निबंधक, जिल्हा भूमिअभिलेख विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण 67 अधिकारी कर्मचाऱ्यांचा यावेळी जिल्हाधिकारी शिनगारे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी, तहसीलदार राहुल सारंग, भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांच्यासह नायब तहसीलदार, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, तलाठी, मंडळ अधिकारी, शिपाई, कोतवाल यांचा सत्कार करण्यात आला. शहापूर दुर्घटनेच्या ठिकाणी तातडीने पोहचून बचाव कार्य सुरू केल्याबद्दल उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, उपविभागीय अधिकारी अमित सानप आणि तहसीलदार कोमल ठाकूर यांचा यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला. या तिघांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरुपात श्रीमती गायकर यांचा सत्कार करण्यात आला.