ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं ज्या तत्परतेनं आंबा विक्री केंद्रावर कारवाई केली त्याचप्रमाणे शहरातील फोफावलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षानं केली आहे. धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी पालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात अतिक्रमण विभागाचं अभिनंदन केलं असून शहरातील इतर फेरीवाल्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. पालिका आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुभाष पथ रस्ता रूंदीकरण करून ठाणेकरांचं मन जिंकलं. मात्र आता त्याच मार्गावर अनेक फेरीवाले, दुकानदारांची वाढीव विक्री जागा बेकायदेशीर पार्कींगमुळे पादचा-यांना चालणं मुश्कील होण्याबरोबरच त्यांच्या हक्कावरही गदा आली आहे. यामुळं सार्वजनिक बस वाहतुकीलाही फटका बसत असून हवेतील ध्वनी प्रदूषण तसंच हवेच्या प्रदूषणातही वाढ झाली आहे. असाच फटका राम मारूती रस्ता, नौपाडा, गोखले रस्ता, उथळसर, खोपट, लोकमान्यनगर अशा विविध ठिकाणी बसत असून पादचा-यांना कोणीच वाली राहिलेलं नाही. त्यामुळं अशाप्रकारची कारवाई शहरातील इतर पदपथांवरील अतिक्रमणांवर करावी अशी मागणी नितीन देशपांडे यांनी केली आहे.