ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी अभियानाचा ७ वा वर्धापन दिन यंदा विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्मार्ट सिटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांबाबत मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ जून २०१५ रोजी देशात १०० शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजना राबविण्याबाबत घोषित केले होते. त्याप्रमाणे एकुण ४ टप्प्यात विविध राज्यातील एकूण १०० शहरांची निवड करण्यात आली. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ठाणे शहराची निवड करण्यात आली आणि केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार ठाणे स्मार्ट सिटी या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे.या अंतर्गत शहरात विविध प्रकल्प राबविण्यात आले आहेत. या स्मार्ट सिटी अभियानास ७ वर्षे पूर्ण झाली. दत्ता मेघे अभियांत्रिकी काँलेजच्या काँप्युटर अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना निळकंठ येथील परिवहन सेवा केंद्रातून चालविण्यात येणाऱ्या इंन्टेलिजन्ट ट्रान्सपोर्ट सिस्टीम या प्रकल्पाची माहिती प्रकल्प प्रमुखांनी दिली. ठाणे रेल्वे स्टेशन पुर्व येथे राबविण्यात येणाऱ्या मल्टीमोडल मोडल ट्रान्झिट हब, गावदेवी मैदानात उभारण्यात आलेल्या भुमिगत पार्किंग प्रकल्प तसेच मासूंदा तलावाजवळ उभारण्यात आलेल्या ग्लास कँन्टीलिव्हर फुटपाथ या प्रकल्पाची माहिती दत्ता मेघे अभियांत्रिकी काँलेज आणि तेरणा अभियांत्रिकी काँलेजच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्याचप्रमाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना हाजुरी येथे उभारण्यात आलेल्या इंटिग्रेटेड कमांड अँन्ड कंन्ट्रोल सेंटर या प्रकल्पाचे परीचलन आणि उपयोगिता याबाबतची माहिती देण्यात आली. तसेच दत्ता मेघे अभियांत्रिकी काँलेजच्या काँप्युटर अभियांत्रिकी आणि मॅकेनिकलअभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नळ संयोजनावर बसविण्यात आलेल्या स्मार्ट वाँटर मिटर बाबतीत प्रेझेन्टेशन आणि लाईव्ह डेमो प्रकल्प प्रमुखांनी दिले. नागला बंदर खाडी किनारा सुशोभीकरण प्रकल्पाच्या जागी कार्यकारी अभियंता विकास ढोले आणि महेश अमृतकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी दत्ता मेघे अभियांत्रिकी काँलेज आणि तेरणा अभियांत्रिकी काँलेज च्या विद्यार्थ्यांना या प्रकल्पाची माहिती करून देण्यात आली. या सर्व उपक्रमास विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.