जून महिना संपत आला तरी यंदा पावसानं दडी मारली असून पाऊस आता सुरू झाला नाही तर तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा साठाही आता कमी झाला आहे. यंदा लवकर पाऊस येईल अशी शक्यता आधी वर्तवण्यात आली होती. मात्र आता जून महिना संपत आला तरी हवा तसा पाऊस सुरू झालेला नाही. जिल्ह्यातील तालुक्यांप्रमाणे पावसाची टक्केवारी ही अतिशय कमी असल्याचं दिसत आहे. ठाणे तालुक्यात आत्तापर्यंत १४८ मिलीमीटर पाऊस झाला असून गेल्यावर्षी आत्तापर्यंत ९२७ मिलीमीटर पाऊस झाला होता. कल्याममध्ये आत्तापर्यंत अवघा ९९ मिलीमीटर पाऊस झाला असून गेल्यावर्षी आत्तापर्यंत ७०८ मिलीमीटर पाऊस झाला होता. मुरबाडमध्ये १४६ मिलीमीटर तर गेल्यावर्षी ३९९ मिलीमीटर, भिवंडीत आत्तापर्यंत ११५ मिलीमीटर तर गेल्यावर्षी ७८६ मिलीमीटर, शहापूरमध्ये आत्तापर्यंत १२९ मिलीमीटर तर गेल्यावर्षी ५०९ मिलीमीटर, उल्हासनगर आत्तापर्यंत ११६ मिलीमीटर तर गेल्यावर्षी ६५४ मिलीमीटर, अंबरनाथमध्ये आत्तापर्यंत ११६ मिलीमीटर पाऊस झाला असून तर गेल्यावर्षी ५४९ मिलीमीटर पाऊस झाला होता. पावसाची ही आकडेवारी पाहता गेल्यावर्षीच्या तुलनेत खूपच कमी पाऊस यंदा झालेला आहे.