ठाणे महापालिकेचे नवीन आयुक्त म्हणून विजय सिंघल यांनी सूत्रं स्वीकारली आहेत. विजय सिंघल हे उच्चशिक्षित असून त्यांनी आयआयटी रूरकी मधून सिव्हील इंजिनियरिंग केलं आहे. त्यानंतर त्यांनी दिल्लीतून एमबीए केलं आहे. काही दिवस रेल्वेमध्ये काम केल्यानंतर त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. १९९७ च्या महाराष्ट्र तुकडीचे ते अधिकारी आहेत. त्यांची पहिली नेमणूक कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून काम केलं. जळगावमधील नदी जोडणी प्रकल्पामुळे त्यांचं नाव झालं. नदी जोड प्रकल्पाबद्दल परदेशातही त्यांनी अनेक शोधनिबंध सादर केले असून त्यांना पंतप्रधानांचा उत्कृष्ट प्रशासक म्हणून पुरस्कारही मिळाला आहे. जळगावचे जिल्हाधिकारी असताना जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला आयएसओ सर्टीफिकेशन मिळालं होतं. त्यांची खेळाडू म्हणूनही ओळख असून त्यांनी साखर आयुक्त म्हणूनही काम केलं आहे.